मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि..26जून 2021:–
महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.
राज्य सरकारने कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर राज्यामध्ये 5 टप्प्यांत निर्बंध शिथिल केले होते. मात्र राज्य अनलॉक झाल्यानंतर काही काही जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यासोबतच राज्यात डेल्टा प्लस या व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागल्याने राज्य सरकारने आधीच्या नियमावलीमध्ये काही नवीन बदल केले आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा तसेच महानगरपालिकांचा समावेश आता तिसऱ्या गटाच्या वरच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नव्या नियमानुसार असे असणार निर्बंध –
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे.
विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल.
आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.
काय आहेत नवे नियम? स्थानिक प्रशासनाला निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढविण्याबाबत फक्त RT-PCR चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच आधारभूत मानण्याचे निर्देश.
पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे. लसीकरणासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे. हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे. गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे. कंटेन्मेंट झोन तयार करताना काळजी पूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील काही आठवड्यांमध्ये कोरोना स्थितीचा आढावा तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट या व्हायरसच्या प्रसाराचा वेग या बाबींचा विचार करून राज्य सरकार पुढील निर्णय घेणार आहे. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा निर्बंधांसह कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे.