मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 24 जून 2021:-
अंबानी यांच्या अँटीलीयान बंगल्या समोरील स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत सचिन वाजे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे यांच्यानंतर प्रदीप शर्मा या पाच संशयित आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे काम सुरू आहे, मात्र त्यांच्यानंतर अजूनही मुंबई पोलिसांच्या पैकी काही अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. यासंदर्भात पोलिस दलामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून, त्यांना सोडून दिले होते. मात्र प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता पुन्हा त्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संबंधातील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडून समजली आहे.
प्रदीप शर्मा सेवेत आल्यानंतर, त्यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची सर्व जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या काळात मुंबईमधील अनेक मोठ-मोठ्या खंडणी प्रकरणावर कार्यवाही करण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या संपर्कात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी होते. प्रदीप शर्मा यांची सरकारने बदली केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता.
परंतु राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही हे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी प्रदीप शर्मा यांच्या संपर्कात होते. प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता सबंधित पोलिस अधिकार्यांचा नंबर लागणार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसुख हिरण यांच्या हत्याकांड प्रकरणानंतर त्याचे मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर व प्रदीप शर्मा चालवत असलेले एक फाउंडेशन अडचणीत आले असल्याची चर्चा सुरू आहे. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांना ही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याच बरोबर प्रदीप शर्मा चालवत असलेल्या फाऊंडेशनच्या काही कर्मचाऱ्यांना ही चौकशीसाठी समोर जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.