बनवा बनवी….आणि बदलाशी करून वनविभागाच्या जमिनीवर पाडले प्लॉट.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-
नागपूर जिल्ह्यातील वन विभागाच्या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून भूखंड ३४ लोकांना विकले. हा प्रकार समोर येताच लोकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून नऊ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राजश्री अमरदीप कांबळे (वय ५२), मनीषा अमरदीप कांबळे (वय ३०), किरण समर्थ (वय ३०), मेंढे, वासुदेव इंगोले (वय ४५), शाहनवाज खान (वय ४५), एसआरबी कंपनीचा संचालक संदीप सहदेव मेश्राम (वय ३८), आकाश भारद्वाज (वय ४०) आणि राम किशोर रहांगडाले (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. वर्षा विजय भुरे (वय ३६, रा. शासकीय वसाहत, रविनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
अनेक वर्षांपूर्वी गोरेवाडा येथील वनविभागाची काही जमीन महापालिकेने घेतली होती. परंतु, महापालिकेने त्या जमिनीचा वापर न केल्याने जमीन पुन्हा वनविभागाला परत करण्यात आली. याची माहिती आरोपींना होती. आरोपींनी संगनमताने त्या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर त्या जमिनीच्या विक्रीचे व्यवहार आपापसात करून २०१८ मध्ये त्यावर ले-आउट टाकले. त्यावरील भूखंडांची लोकांना लाखो रुपयांमध्ये विक्री केली.
काही दिवसांपूर्वी महापालिकेने ती जमीन वनविभागाला परत केली. वनविभागाने जमिनीचा ताबा घेण्यापूर्वी मोजणी केली असता लोकांना ही जमीन आपल्या मालकीची नसल्याचे समजले. त्यांनी आरोपी राजश्री व इतरांशी संपर्क साधून पैसे परत मागितले. परंतु, आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनात चौकशी करून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.