निरा नरसिंहपुर: दिनांक- 23,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीर रित्या उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ हजारो पुणे सकल जैन समाजाच्या वतीने दि. २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. न्यायालयाचा आदेश झाला नसताना देखील मनमानी पद्धतीने मंदिर पडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, उध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण व्हावे या प्रमुख मागणीचे पत्र पुणे सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दि. १६ एप्रिल रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता बृहन्मुंबई महापालिके तर्फे अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उध्वस्त करण्यात आले. मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य तसेच तीर्थंकर प्रतिमेची देखील विटंबना करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कारभारामुळे देशातील समस्त जैन धर्मिय समाज अत्यंत आक्रोशित झाला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या लक्षात आणून देण्यात आले. निषेधाचे निवेदन सकल जैन समाजाच्या वतीने अचल जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले. जैन समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत निश्चित पोहोचविण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी प्रतिनिधींनी दिले.गेल्या अनेक वर्षांपासून जैन तीर्थस्थळांवर सुरू असलेले अतिक्रमण, यात्रेकरू तसेच जैन गुरू, साधू, साध्वी यांच्यावर होणारे हल्ले, जैन धर्मावर, समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सकल जैन संघ चिंतीत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. राज्य,देशातील सर्व जैन धर्मीय तीर्थक्षेत्रे, मंदिरे,स्थानक, उपाश्रय, साधू, साध्वींचे निवासस्थान अशा सर्व धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा व्हावा, जैन धर्मिय साधू-साध्वी संतविहार करताना संपूर्ण वेळ सरकारच्या वतीने त्यांना संरक्षण देण्यात यावे, जैन धर्मियांची अत्यंत प्राचिन व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांवर जसे, पालिताना, गीरनार, समेद शिखरजी, राजगृही, राणकपुर तसेच अन्य ठिकाणी पूजा-भक्ती करण्यापासून विविध समाजकंटकां कडून रोखले जात आहे त्याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून कारवाई होऊन जैन धर्मियांना संरक्षण मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.आंदोलनाच्या सुरुवातीस व शेवटी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.यावेळी मिलिंद फडे म्हणाले, मुंबईतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सर्व समाज बांधव एकत्र झाले आहेत याचा आनंद असून आपण सर्वांनी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे.अचल जैन म्हणाले, समाजाच्या भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. समाजाच्या भावनांचा जर विचार झाला नाही, न्याय मिळाला नाही तर पुढील भूमिका आपण सर्वसमावेशक पद्धतीने ठरवू.यावेळी युवराज शहा, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, सुरेखा शहा, अजित पाटील, इंद्रकुमार छाजेड, प्रिती पाटील, सुरेश शहा, लक्ष्मीकांत खाबिया, सुरेंद्र गांधी, संपत जैन, सतीश शहा, समीर जैन, नितीन जैन, भरत सुराणा, अॅड. योगेश पांडे, अभय जैन, अल्पेश गोग्री, प्रीतम मेहता यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी निषेधात्मक भावना व्यक्त करत आंदोलनाला पाठींबा दिला.
