श्रीपूर,
बी.टी.शिवशरण (ज्येष्ठ पत्रकार)
साधारण हा काळ पन्नास ते बावन्न वर्षांपूर्वी चा आहे. दी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि कंपनी या साखर कारखान्यात सिव्हिल खात्यात त्या वेळी कारखान्याचे माध्यमातून कामं करण्यासाठी साधारण तीन बैलगाड्या होत्या. एक बैलगाडी माझे वडील हाकत. कारखान्याचे वतीने सिव्हिल विभागात बैलांसाठी स्पेशल गोठा कारखान्याचे आवारात होता. त्यावेळी कारखान्याचे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की डाव्या हाताला पत्र्याचा गोठा होता. समोर बैलगाडी सोडलेली असतं त्यावेळी सहा बैल जोड्या होत्या पांढरीशुभ्र बैल मला आठवतात. धष्टपुष्ट उंच व पाठीवर माने जवळ वशींड शिंगे टोकदार होती.
माझे वडील त्या बैलांची खूप काळजी घेत. त्या दोन बैलांची नांव निल्या व राजा होती. माझे वडील खणखणीत आवाजात निल्या राजा उठ म्हटले की ते ताडकन उठून उभी रहात. वडीलांच्या खांद्यावर गोंडा असलेला आसूड कायम असायचा. माझे वडीलांना मोठ्या झुपकेदार मिशा असत. आणखी दोघे इतर दोन बैल गाड्या हाकत. त्या वेळी कारखान्यातील बाहेरची कामं म्हणजे मुरुम आणणं, सिमेंट पोती आणणं, सरपण टाकणं, कारखान्याला पांढरा चुना आणणं, बाहेर कारखान्याच्या खोली बांधकामासाठी वीटा सिमेंट वाळू वासे बांबू यांची वहातुक बैलगाडी माध्यमातून केली जायची. त्यावेळी ट्रॅक्टर नव्हते मला त्यावेळी ती भलीमोठी बैलगाडी आकर्षण वाटायचं. वडिलांनी बैलगाडी बाहेर कामानिमित्त काढली की मी त्या बैलगाडी मध्ये बसून वडिलांचे कामाचे ठिकाणी जात असे. त्या वेळी बैलगाडी मध्ये बसायला मिळते याच अप्रूप वाटायचं.
ज्या वेळी बैल पोळा सण असायचा त्यावेळी सर्व बैल धुण्यासाठी नीरा उजवा कालवा फाट्यावर घेऊन जात. बैलांना त्यावेळचा प्रसिद्ध ब्रांड सनलाईट साबणाने आंघोळ घासून पुसून चोळून घातली जायची. आम्ही बाजूला बसून हे सर्व पहात असू. बैलगोठा परिसर शेणानं सारवलेला असायचा रंगिबेरंगी कागदांच्या पताका सुतळी वर बांधलेल्या मुळे बैलपोळा सण महत्वपूर्ण वाटायचा.
सिव्हिल खात्यात त्या वेळी काही महिला कामांवर असायच्या पाच ते सात महिला त्या बैलगोठा शेजारी असलेल्या पत्रा शेडमध्ये पुरण पोळी स्वयंपाक करत. बैलांना सजवले जात त्यावेळी बैलांच्या पाठीवर रंगीबेरंगी नक्षी काढली जायची शिंगांना रंगीत बेगड लावले जात गळ्यात घु़गरांची चंगाळी बांधली जायची. लाल हिरवी पिवळी रंगीत रिबीन बांधली जायची .पायात फुलांचे तोडे बांधत .
हलगी सनई वाजवण्यासाठी आणली जात. बैलांना नक्षीदार विणलेल्या रंगीत झुली घातल्या जात . सजवले नंतर सर्व बैल एका लाईनीत उभी केली जात. स्वयंपाक करणार्या सर्व महिला पुरणपोळी चा नैवेद्य ताटात घेऊन पंचारती घेऊन बैलांना ओवाळीत. मग ती सर्व बैलांना नविन कासरे बांधलेले असत ते बैल वाजवत कारखान्यातून हनुमान मंदीरात दर्शनासाठी आणले जात .
कारखान्याची आकर्षक सजवलेले देखणे रुबाबदार बैल पहाण्यासाठी श्रीपूर च्या रस्त्यांवर लोकांची गर्दी होई. बैल पोळा सणा दिवशी माझे वडील पांढराशुभ्र सदरा डोक्यावर ऐटबाज रंगीत फेटा बांधून बैलजोडी धरलेले आजही डोळ्यासमोर दिसतात. हनुमान मंदिरातून परत कारखान्यात बैल घेऊन गेले की त्यावेळी कारखान्याचे मॅनेजर सिव्हिल खाते प्रमुख यांचे हस्ते बैलांची पुजा केली जायची. बैलांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवल्या नंतर कारखान्याचे काही अधिकारी सिव्हिल खात्याचे मजूर यांना पुरणपोळी चे जेवण दिले जायचे. तो बैल पोळा मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जायचा.
मी त्यावेळी तीसरी इयत्तेत असेल. पण तो बैलपोळा आजही माझ्या अंतःकरणात कायमचा कोरला गेला आहे .
सध्या शेती ही यांत्रिक पध्दतीने केली जात आहे. बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टर चा वापर वाढला आहे .काळानुरूप बदल होत आहेत काही कालावधीनंतर हळूहळू बैलगाडी बैल हे इतिहासजमा झाले तर नवल वाटणार नाही.
सदर ही आठवण मी माझ्या मुलांना नातींना पत्नीला आज सकाळी सांगितली ते हसत होते .आज रहाणीमान सकारात्मक व बरे आहे पण वडिलांचे कष्ट त्यांनी आमच्यासाठी केलेले परिश्रम ते गरीबीचे चटके भोगलेले अनुभव आठवणी न कळत डोळ्यात अश्रू आणतात .
आई वडील दोघेही अशिक्षित पण आम्हा भावंडांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. उधार उसनवारी प्रसंगी वडिलांनी व्याजाने पैसे काढून आम्हा भावंडांना शिकवले त्यामुळे आज आम्ही सुस्थितीत आहोत दुसर्याच्या बैलगाडी वर वडिलांना काम करावे लागले पण आज त्यांच्या मुलांकडे नातूंकडे चारचाकी गाड्या आहेत हे आमच्या वडिलांच्या कष्टाचं चीज आहे हे आम्ही नम्रता पुर्वक कबूल करतो.

