मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 26 जून 2021:-
महाराष्ट्रातील अनेक महिला आणि पुरुष होमगार्ड ची सेवा वेगवेगळ्या कारणावरून दोन तीन वर्षांपासून समाप्त करण्यात आली. ज्यांनी आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ होमगार्ड संघटनेसाठी दिला ज्यांनी आपले आयुष्य अक्ष: रक्ष संघटनेसाठी कुर्बान केले. त्यांना केवळ नियमावर बोट ठेवून खड्यासारखे बाजूला सारण्यात आले. एका झटक्यात संघटनेतून काढून टाकण्यात आले.
या अन्यायाविरुद्ध अनेकांनी दाद मागितली. पण होमगार्ड मुख्यालयातील बोटावर मोजण्याइतक्या वेतनी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करू मानसेवी होमगार्ड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची कत्तल करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. न्याय तर दिलाच नाही उलट मुस्कटदाबीचे प्रयोग करण्यात आले, परिणामी अपात्र ठरविण्यात आलेले हजारो लोकप्रतिनिधी व शासन स्तरावर आपले गाऱ्हाणे पोटतिडकीने मांडत होते. शेवटी अपात्र ठरविण्यात आलेल्या होमगार्डला काही अटींच्या अधीन राहून पूर्ववत सेवेत घेण्याचे आदेश भाजप सरकारच्या काळात राज्य शासनाने जारी केले.
शासन निर्णय केला बाजुला?
शासन आदेशानुसार होमगार्ड मुख्यालयाने त्वरित कार्यवाही करणे अपेक्षित होते. पण दुदैवाने लगेच तसे काही घडले नाही.विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर असतात 20-25 वर्ष सेवा झालेल्या प्रशिक्षित अपात्र होमगार्डना पुर्ववत सेवेत घेण्याऐवजी नव्याने होमगार्ड भरती ची मोहीम राज्यभर राबविण्यात आली. लक्ष्यसंख्या पुर्ततेची खेळी.? अपात्र, सेवानिवृत्त व मयत झालेले होमगार्ड यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांची संख्या शेकडोंच्या घरात होती. या जागांवर नवीन महिला व पुरुष होमगार्ड यांची भरती करण्यात आली. जेणेकरून अपात्र होमगार्डला पुन्हा संधी देण्यासंदर्भात आगामी काळात शासन निर्णयानुसार विचार जरी करण्यात आला तर लक्ष संख्या पूर्ण झाल्यामुळे आता सेवाज्येष्ठतेनुसार अपात्र मधून रिक्त जागा भरता येतील याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. आणि विशेष म्हणजे होमगार्डच्या ईतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी महिला व पुरुष 200/250 जवान ( प्रत्येक जिल्ह्यात ) यांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. भारतच्या सिमेवर युध्द सुरु होणार आहे. शत्रू सिमेवर उभा आहे. आणि आता सैनिक कमी पडतील. त्यासाठी त्यांच्या जागी होमगार्ड पाठवायचे आहेत. असे ग्रहित धरुन वर्षानुववर्षांचे तत्कालीन मा. महासमादेशक यांनी घालून दिलेले नियम, अटी बाजुला सारून नविन होमगार्ड प्रशिक्षणाचे कारखाने त्या काळात महाराष्टात जिल्हया …जिल्ह्यात निर्माण केले.
अपात्र वाल्यांसाठी रनिंगचा नविन फंडा?? अपात्र होमगार्डला पुन्हा सेवेची संधी देण्यासाठी ” फिजिकल फिटनेस ” या नावाखाली पुरुष होमगार्ड यांना 800 मीटर रनिंग तीन मिनिट 45 सेकंदात तर महिला होमगार्ड साठी 400 मीटर रनिंग दोन मिनिटात पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले. ज्यांनी चाळीशी पार केली आहे, ज्यांची पन्नाशी उलटली आहे. जे हृदय रोगी आहे ज्यांना मधुमेह आहे किंवा अनेक विकार आहेत त्यांना शिधिलता देण्याचा साधा माणुसकीचा ( आजपर्यंत केलेली सेवा तर सोडूनच दिली हो ) विचार देखील करण्यात आला नाही. ज्याचे वय पन्नास वर्ष आहे ती व्यक्ती तीस वर्षाच्या व्यक्ती सोबत स्पर्धात्मक धाऊ शकते का?हा साधा प्रश्न आहे? गृहराज्यमंत्री यांच्या सोबत मार्च 2019 रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताचा सोईस्कर अर्थ लाऊन मी म्हणेल ती पुर्व दिशा या पध्दतीने सर्व अपात्र होमगार्ड यांना कुठल्याही परिस्थितीत संघटनेत येऊ द्यायचे नाही. या साठीच तयार करण्यात आलेली ही रणनिती आहे. मेडीकल बोर्ड,जिल्हा शल्यचिकीत्सक कशासाठी ?राज्य राखीव दल, महाराष्ट्र पोलीस दल यांच्यात कार्यरत असलेले अधिकारी, जवान यांची ठराविक वर्षांनंतर शारिरिक क्षमता अजमविण्यासाठी रनिंग घेतल्या जात नाही. मग
होमगार्ड हे एनएसजी चे कमांडो आहेत का?
राज्य शासन, शासन अंतर्भुत सर्व कार्यालये, महामंडळ आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना फिजीकल फिटनेस प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, मेडीकल बोर्ड यांचे बंधनकारक आहे. मग होमगार्डला हा नियम लागू नाही का? यावरूनच छळवादाची प्रवृत्ती अधोरेखित होते.
होमगार्ड संमेलनाचा केवळ दिखावा ?? होमगार्डच्या व्यथा, अडी, अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संमेलने घेण्याचे आदेश होमगार्ड मुख्यालयाने दिले. दोन वेळा ही संमेलने घेण्यात आली. हजारो होमगार्ड यांनी आपली मनोगते व्यक्त करुन अडी अडचणी मांडल्या. अपात्र ठरलेले होमगार्ड यांनी देखील बेंबीच्या देठापासून ओरडून आपल्या व्यथा जिल्हास्तरावर मांडल्या. पण त्याचा काय उपयोग झाला? ही संमलने म्हणजे केवळ गृह विभाग व होमगार्डच्या समाधानासाठी केलेला हा फार्स होता. हे वास्तव आहे. मरण डोळ्यासमोर दिसत असताना धावले. आज प्रत्येक माणुस ताणतणावातून जिवन जगत आहे. त्यामुळे हदयरोग आणि मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंन दिवस वाढत चालली आहे. लहान लहान मुलांना मधुमेह झाला आहे.
अपात्र ठरलेले अनेक होमगार्ड विविध व्याधी, मधुमेही, हदयरोगी आहेत. ज्यांची एन्जोप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे, असे होमगार्ड मरण समोर आहे हे माहित असून देखील कुटुंबाच्या पालणपोषणासाठी जिवांच्या आकांताने धावले. अशा घटना ऐकल्या की हृदय पिळवटून येते. मन सुन्न होते.
” या चिमणी पाखरांच “दुःख मुंबईत तिसऱ्या मजल्यात ए. सी. मध्ये बसलेल्या लोकांना काय कळणार.. काही जण या जीवघेण्या रनिंगमध्ये जिंकले. तर काही जण सेकंदाच्या फरकाने अपात्र च्या लाईनमध्ये पुन्हा जाऊन बसले.
नवीन भरती व प्रशिक्षणासाठी केला करोडोंचा खर्च?? जुने होमगार्ड शिस्तप्रिय, प्रगत प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेले असून अशा अपात्र लोकांना सेवेत पुन्हा सामावून घेतले असते तर करोडो रुपयांचा चुराडा झाला नसता. पण नवीन होमगार्ड भरती, त्यांचे प्रशिक्षण, उपहार भत्ता यासाठी करोडो रुपयांचा खर्च करून शासनाची तिजोरी रिकामी करण्यात आली. हे विशेष.
युज अँड थ्रो. ची निती.??होमगार्डची एकूणच व्यवस्था युज अँड थ्रो… अशी करून टाकली आहे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तर सोडा एक छदामही दिल्या जात नाही. होमगार्डच्या वेलफेअरचा विचार आता दुर्दैवाने केल्या जात नाही. आरोग्याच्या योजना नाही, विमा योजना नाही, पाल्यांसाठी शैक्षणिक योजना तर कोसो दूर राहिल्या. होमगार्ड विरुद्ध कारवाई करायची असेल तर मग मात्र संघटना तयार झाली, त्यावेळी म्हणजे 74 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या होमगार्ड अधिनियमाचे पुस्तक उघडल्या जाते. देशात अनेक कायदे बदलले पण या अधिनियमात आता काळानुरूप बदल केले पाहिजे असे होमगार्ड मुख्यालयास का वाटत नाही? हा प्रश्न अचंबित करतो.
होमगार्डला पुन्हा सेवेत घ्यावे.
कोविड-19 मुळे अख्खे जग आज होरपळून निघाले आहे. आर्थिक अडचणीचा फटका देशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला बसलेला आहे. त्याची झळ अपात्र होमगार्ड, पन्नास वर्ष वय झाल्यामुळे बंदोबस्त नाकारण्यात आलेले होमगार्ड यांना प्रचंड प्रमाणात बसली आहे. कोविड काळात सरकार सर्वांना आर्थिक मदत करते. पण होमगार्डचा विचार केल्या जात नाही. होमगार्ड देखील शेवटी माणूस आहे. त्याला देखील परिवार आहे. होमगार्डच्या बंदोबस्त ड्यूटी मुळे अनेकांच्या खाजगी नोकऱ्या गेल्या आहेत. मोलमजुरी करून त्यांना गुजराण करावी लागत आहे. महिला होमगार्डची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, अनाथ, बेसहारा महिला होमगार्ड मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य संघटनेच्या नावलौकिकास साठी अर्पण केलेले आहे त्यातील बहुतांश जणांना ” रनिंग ” च्या नावाखाली ” कोलदांडा ” देऊन हतबल केले आहे.त्यांच्या परिवाराच्या ताटातील नुसती रोटीच नाही तर जेवणाचे ताटच हिसकावून घेतले आहे.त्यांच्या जगण्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
गृहराज्यमंत्री यांची देखील दिशाभूल?? होमगार्डच्या कल्याणासाठी अनेक समाजसेवक जिवापाड प्रयत्न करीत आहेत. त्यांचे अंतःकरण पुर्वक अभिनंदन व जाहीर आभार. गृहराज्यमंत्री मा. सतेज पाटील सर यांनी नुकतीच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. अपात्र होमगार्डच्या संदर्भात सर्वांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे आता सर्व जिल्हयांना कळवावे त्यानंतर प्रधान सचिव यांनी पडताळणी करून निर्णय घ्यावा,असे आदेशित केले आहे. यावरुन असे दिसून येते की, मा.गृह राज्यमंत्री यांची देखील मुख्यालयाने दिशाभूल केल्याचे दिसून येते. वस्तुस्थिती त्यांना देखील सांगण्यात आली नाही.
आता प्रधान सचिव यांनी पडताळणी करुन वस्तुनिष्ठ अभिप्रायासह अपात्र होमगार्ड संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यासंदर्भात मुख्यालयास आदेशित करणे अत्यंत गरजेचे आहे. मा. गृह राज्यमंत्री यांनी या सर्व परिस्थितीचा मानवीय दृष्टिकोनातून विचार करावा. होमगार्ड मुख्यालयाने केलेली “चालबाजी ” याचा बारकाईने अभ्यास करावा. पदर पसरून न्याय मागण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या महिला व पुरुष होमगार्ड यांना लक्ष संख्या पूर्ततेची अट बाजूला सारून पुन्हा सेवेत घेण्यात यावे अशी मागणी
नंदाताई मोहिते जालना यांनी केली आहे.