वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न झालं आहे . या प्रकरणी कुणी हगवणे कुटुंबियांना दोष देत आहेत . तर कुणी राजकारण्यांना तर कुणी पोलिस प्रशासनास जबाबदार धरत आहेत . तसेच कुणी महिला आयोगाला दोषी ठरवत आहे . टि . व्ही . चॅनेलवर सुरू असणाऱ्या चर्चेत अनेक राजकारणी, कायदेतज्ञ , समाजसेवक , विविध पक्षाचे प्रवक्ते आपापल्या कुवतीप्रमाणे सदर प्रकरणी आपले मत ठामपणे मांडत आहेत . कुणी वैष्णवीच्या प्रेमविवाहाला दोषी ठरवत आहेत . अनेक जण यासाठी वैष्णवीच्या आई – वडिलांनाही असं करायला नको होतं असं मत मांडताना दिसतात . पण वैष्णवीच्या आई – वडिलांना असं का करावं लागलं यावर मात्र कुणीच चकार शब्दही काढत नाहीत . मला वाटतं की ज्या प्रमाणे वैष्णवीच्या मृत्युला हगवणे कुटुंब व शासन – प्रशासनही अंशतः जबाबदार आहे .
शासन – प्रशासनाच्या पाठबळा शिवाय एवढी पाशवी प्रवृत्ती निर्माण होऊ शकत नाही . हे सर्व काही सत्य असलं तरी आपल्या मुलीला त्रास होतोय आपली आर्थिक लूट सुरू आहे हे माहीत असूनही तिच्या आई वडिलांनी सर्व काही सहन केलं त्यांच प्रमुख कारण आहे ‘लोकं काय म्हणतील ?’

समाजात वावरताना प्रत्येक कुटुंबाची प्रतिष्ठा , मानसन्मान, आदर, कुलाचार , ताठ मानेने उभे राहण्याची असणारी भूमिका, मुलीची बाजू पडती असावी अशी चुकिची धारणा , घराण्याची परंपरा, इज्जत आणि लोकं काय म्हणतील ? या अवाजवी व अमर्यादित आणि अघोषित सामाजिक बंधनात समाजाने अप्रत्यक्ष जखडून ठेवलेले वैष्णवीचे आई – वडील शेवटी काय करणार ? त्यांच्या कडून जे शक्य ते सर्व प्रयत्न त्यांनी केले . पण एखाद्या जिवंत अतृप्त आत्म्याच्या इच्छा कुणीच पुर्ण करू शकत नाही . ना त्याकरता कोणता विधी आहे . संबंधितांवर कारवाई करणे म्हणजे झाडाची एक फांदी तोडण्यासारखे आहे . मग झाडाचं काय ? ते झाड म्हणजेच मानवी समाजाची असणारी मानसिकता . ते काहीही असो वैष्णवीच्या बळीला हगवणे कुटुंब , शासन, प्रशासन, राजकिय पाठबळ ही सर्व कारणं असली तरी त्या सर्व कारणांच मुळ आहे *लोकं काय म्हणतील ?
प्रा. रविंद्र आठवले 9096792440